नंदनवनात रक्तपात (अग्रलेख)   

हल्लेखोर कोठून आले हे राष्ट्रीय तपास संस्थेस व लष्करास लगेचच समजेल. त्या आधारे व्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक’सारखी कारवाई पुन्हा होऊ शकते. त्यास सर्व देशाचा पाठिंबा असेल यात संशय नाही.
 
काश्मीर मधील पहलगाम हे पर्यटकप्रिय शहर. तेथील एक निसर्गरम्य ठिकाण. बर्फाच्छादित पर्वत आणि हिरवळ, थंड हवा यांची मौज लुटणारे पर्यटक. अचानक त्यांच्यावर हल्ला होतो. काही क्रूरकर्मा अतिरेकी तेथे घुसतात आणि बेछूट गोळीबार करतात. काही मिनिटात सुमारे २८ निरपराध पर्यटक मृत्युमुखी पडतात. अवघा देश या घटनेने सुन्न झाला. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजीे झालेल्या हल्ल्यानंतरचा नागरिकांवर झालेला हा पहिलाच मोठा हल्ला मानावा लागेल. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स भारत भेटीवर असताना व पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर असताना भर दुपारी  झालेला हा हल्ला पूर्वनियोजित होता हे उघड आहे. ‘रेझिस्टन्स फ्रंट’ या फार माहीत नसलेल्या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे हे पिल्लू आहे आणि हल्ल्यामागचा मेंदू पाकिस्तानात आहे हे सांगण्यास कोणा तज्ज्ञाची गरज नाही.  काश्मीरमध्ये पर्यटनाचा हंगाम ऐन बहरात असताना झालेला हा हल्ला देशात घबराट माजवण्याच्या उद्देशाने झाला आहे. आपले अस्तित्व दाखवून देण्याचा अतिरेक्यांचा हेतु आहेच. ज्या पद्धतीने पर्यटकांना वेचून मारण्यात आले त्या वरून समाजात तेढ वाढवण्याचा हेतूही स्पष्ट होतो.

हवे प्रत्युत्तर; राजकारण नको

पंजाबमध्ये खलिस्तानवादी अतिरेकीही बस गाड्या अडवून प्रवाशांना नाव व धर्म विचारून त्यांची हत्या करत असत. ९० च्या दशकाच्या प्रारंभी जम्मू-काश्मीरमध्येही असे प्रकार घडत असत. त्यांची आठवण ताज्या हत्याकांडाने झाली. जम्मू-काश्मीरचा खास दर्जा रद्द केल्यानंतरचा हा पहिलाच मोठा हल्ला आहे. तेथे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. मतदारांनी अतिरेकी आणि फुटिरतावादी यांना न जुमानता मतदानात भाग घेतला. लोकशाही प्रक्रिया येथे यशस्वी होत आहे हे न आवडलेले घटक भारतात व शेजारीही आहेत. गेल्या दि.१६ रोजी परदेशी पाकिस्तानी नागरिकांचा एक समारंभ इस्लामाबादेत पार पडला. त्यात पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांचे भाषण झाले होते. काश्मीर ही आमची मुख्य रक्तवाहिनी आहे आम्ही काश्मीरला विसरलेलो नाही, अशा आशयाची विधाने त्यांनी या वेळी केली होती. नागरी कार्यक्रमात लष्कराच्या प्रमुखांचे भाषण का व्हावे? हा प्रश्न आहे; पण पाकिस्तानी लष्कराचे व त्यामुळे तेथील सरकारचे अस्तित्वच काश्मीर या मुद्द्यावर टिकून आहे हे वास्तव आहे. त्या भाषणानंतर लगेच हा हल्ला होणे हा योगायोग नाही. हल्लेखोरांनी लष्करी पोषाख वाटावा असा पेहेराव केला होता. काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांचा राबता असतो त्यामुळे पर्यटकांना कसलाही संशय आला नाही. हाच विचार हल्लेखोरांचा असेल. त्यांच्याकडे ‘ए के-४७’ व एम-४ अशी आधुनिक शस्त्रे होती. ती त्यांना पाकिस्तानी लष्कराने पुरवली असणार यात शंका नाही. येथे आलेले पर्यटक देशाच्या विविध भागातून आले होते. कोणी कुटुंबासह सुटीचा आनंद घेण्यास, कोणी मधुचंद्र साजरा करण्यास आले होते. त्यांची हत्या हा देशावरील हल्ला ठरतो. अतिरेक्यांनी जाणूनबुजून धर्माचा उल्लेख केला; भारतात धार्मिक विद्वेष निर्माण करणे हा त्यामागचा त्यांचा हेतु असला तरी देशवासीयांनी या काळात शांतता व एकोपा पाळून त्यांचा हा हेतु उधळून लावणेही गरजेचे आहे. नजीकच्या व जुन्या इतिहासाच्या आधारे राजकारण होणे या घडीस देशाच्या हिताचे नाही. राष्ट्रीय तपास संस्थेकडे या हल्ल्याच्या चौकशीची सूत्रे सोपवली जाण्याची शक्यता आहे. हल्लेखोरांची छायाचित्रेही एव्हाना समोर आली आहेत. त्या आधारे लष्करही त्यांचा माग काढण्यात गुंतले असेल. हल्लेखोर व त्यांचे सूत्रधार यांना चोख प्रत्युत्तर देणे गरजेचे आहेच; पण पाकिस्तानच्या विरोधात भारताने काही कारवाई केल्यास चीन त्याच्या बाजूने उभा राहतो हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजेच कारवाईस आंतरराष्ट्रीय स्वरूप न मिळण्याची दक्षता केंद्राला घ्यावी लागेल. मात्र नंदनवनात रक्तपात घडवणार्‍यांना लवकरच कठोर शिक्षा मिळेल अशी आशा देशास आहे.
 

Related Articles